Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "रेड्याची मंतरलेली शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरली, म्हणून मुख्यमंत्री"…; संजय...

Sanjay Raut: “रेड्याची मंतरलेली शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरली, म्हणून मुख्यमंत्री”…; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

नाशिक | Nashik
राज्याचे विद्यमान मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी झाला. पण त्यानंतर जवळपास तीन महिने होऊनदेखील अद्याप मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेले नसल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. “मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नासारखा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हा आमचा प्रश्न आहे”, असे संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान म्हणाले.

- Advertisement -

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली, मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, खातेवाटप झाले, पालकमंत्री आणि मंत्र्‍यांच्या बंगल्याचे वाटपही झाले. पण अद्यापही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षावर मुक्कामाला गेले नाहीत, हाच धागा पकडत संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत आरोप केलाय.

शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतर वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे लिंबू सापडले असे विधान केल्यानंतर आता त्यावर संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “किती वेळा त्यावर बोलायचे? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? हा ‘मारूती कांबळेचे काय झाले’, यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके दिवस झाले त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन. पण मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षावर अद्याप आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत?” असा सवाल संजय राऊतांनी केला.

संजय राऊत म्हणाले, आम्ही अंधश्रद्धा निर्मुलन कायदा मानणारे आहोत परंतु काही चर्चा सुरू आहेत. कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग काही लोकांनी आणलीत. ती शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरलीत. मुख्यमंत्रिपद दुसऱ्या कुणाकडे टिकू नये असे काही आहे. तिथला कर्मचारी वर्ग तसे सांगतायेत. आम्ही मुद्दा लावून धरत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हा प्रतिष्ठेचा विषय आहे. तिथे काय झालेय, काय घडलेय, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकी भीती कशाची आहे. ते अस्थिर आणि अस्वस्थ का आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेऊन इतके महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे तिथे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जात नाहीत, राहायला गेलो तरी मी झोपायला जाणार नाही असे फडणवीस म्हणतायेत असे ऐकण्यात आले. हा काय प्रकार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे शिंदे गटात जे लिंबूसम्राट आहेत त्यांनी उत्तर द्यावे असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह नेत्यांना लगावला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...