मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने म्हणजेच डिसेंबरपर्यंत ते राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही गोष्टींपासून लांब राहणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी ३१ ऑक्टोबरला केली होती. मात्र आज बऱ्याच दिवसांनी ते माध्यमांच्या समोर आले आणि नेहमीप्रमाणे त्यांची तोफ धडाडली. प्रकृतीबाबात, आजारपण, उपाचारांबाबात माहिती देतानाच त्यांनी शिंदे गट, भाजप, एकंदर राजकारण यावरही सविस्तर प्रतिक्रिया देत टीकास्त्र सोडले.
उध्दव ठाकरेंचे माझ्यावर बारीक लक्ष
‘माझ्यावर अद्याप उपचार सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारते आहे. पूर्ण बरं व्हायला अजून थोडा वेळ लागेल. १ महिन्यापेक्षा जास्त काळ मी घरच्या आणि हॉस्पिटलच्या कैदखान्यात आहे. मा. उद्धव ठाकरे यांचे माझ्यावर बारीक लक्ष आहे, मी कुठे बाहरे पडतोय का हे पहात आहेत ते. आताही त्यांची परवानगी नाही. पण तरीही आपण सगळे आलात, बऱ्या दिवसांनी आपण भेटत आहोत. तब्येतीत थोडी सुधारण होत आहे, यापुढे अजून होईल. उपचार फार कठोर असतात, आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. पण ते चालू आहेत, मला खात्री आहे की डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बरा होईन येईन’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
तुमच्या आजारपणावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, डॉक्टरांची आमची जी टीम आहे, त्यात मुंबईतले प्रमुख डॉक्टर आहे. ते माझ्यावर उपचार करत आहेत आणि रेडिएशनचा जो मुख्य भाग आहे, तो संपलेला आहे. इतर काही उपचार सुरू आहेत. रिकवरी चांगल्या प्रकारे सुरू आहे, पण माझ्यासारखा माणूस स्वस्त बसू शकत नाही. जर बरा असतो, नगरपालिका निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो असतो.
शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितले लक्ष्मी दर्शन होणार
नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितले आहे की, आज लक्ष्मी दर्शन होणार आहे. त्यामुळे आता कुठे-कुठे लक्ष्मी दर्शन झालेले आहे, याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. राज्याच्या मंत्र्याने जाहीर केले होते की, १ डिसेंबर रोजी सकाळी होणार आहे. त्यामुळे लोक आज सकाळपासून जागेच आहेत. मला जी माहिती की, लोक सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी १० हजार, १५ हजार मतामागे असे लक्ष्मी दर्शन सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
त्यांचा कोथळा अमित शाह काढणार
सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ झाला नव्हता. या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार निवडणूक लढवत नव्हते. स्थानिक पातळीवरच लोक लढत होते. आता 5, 6 हेलिकॉप्टर, खाजगी विमान वापरत आहेत. नगरपालिकेसाठी सत्तेतल्या 3 पक्षातील स्पर्धा आहे. इतके कोट्यावधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय? आपापसात मारामाऱ्या सोडा. तीन पक्षातील ही स्पर्धा आहे. शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही. त्यांचा कोथळा अमित शाह काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता. शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक त्यासाठीच केली आहे.
फडणवीस यांचे राजकारण शिंदेंना समजत नसेल तर…
त्यांना वाटतं की, दिल्लीचे दोन नेते आमच्या पाठीशी आहेत. पण ते कोणाचेच नाहीत. शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे. अमित शाहांनी निर्माण केलेला तो गट आहे. यांनी कधी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या राज्याचे नेतृत्व पाहिलेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती. फडणवीस यांचे राजकारण शिंदे यांना कळतं नसेल तर त्यांनी करू नये. फक्त पैशावर राजकारण चालत नाही, असा हल्लाबोल त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





