दिल्ली । Delhi
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीतील अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ गडी राखून पराभव केला. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर उपांत्य फेरी गाठणारा भारत हा चौथा संघ ठरला असून, विश्वचषकाच्या इतिहासात भारताने सहाव्यांदा अंतिम चारमध्ये स्थान पटकावले आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना १९५ धावांचे तगडे आव्हान भारतासमोर ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि इशान किशन स्वस्तात बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला होता. मात्र, संजू सॅमसनने कठीण समयी खेळाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. सॅमसनने अवघ्या काही चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९७ धावांची वादळी खेळी केली. भारताने हे लक्ष्य ४ चेंडू राखून पूर्ण केले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयाचा चौकार मारल्यानंतर संजू सॅमसनने मैदानात केलेले सेलिब्रेशन सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. विजयाच्या जोशात संजूने आपले हेल्मेट काढून जोरात मैदानावर फेकले. सॅमसनची ही आक्रमक स्टाईल चाहत्यांना आवडली असली, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) शिस्तभंग नियमांनुसार हे वर्तन त्याला महागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर आता संजूला दंड होणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
आयसीसीच्या नियमावलीनुसार, मैदानात बॅट, हेल्मेट किंवा इतर कोणतेही साहित्य फेकणे हे ‘अयोग्य वर्तन’ मानले जाते. खेळाडूंच्या सुरक्षेला आयसीसी सर्वोच्च प्राधान्य देते. मैदानावर अशा वस्तू फेकल्यामुळे अन्य खेळाडू, पंच किंवा मैदानावरील कर्मचाऱ्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये खेळाडूंना दंड ठोठावला जातो, त्यांचे मानधन कापले जाते किंवा त्यांच्या खात्यात ‘डिमेरिट पॉइंट्स’ जोडले जातात.
जर संजू सॅमसनचे हे कृत्य लेव्हल-१ च्या गुन्ह्यात मोडले, तर त्याच्या मॅच फीमध्ये कपात होऊ शकते. यापूर्वीही अनेक खेळाडूंना अशा वर्तनासाठी आयसीसीने समज दिली आहे. संजूने खेळी तर ऐतिहासिक केली, मात्र आता आयसीसी या सेलिब्रेशनकडे कशा पद्धतीने पाहते आणि त्यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्याआधी संजूवर कोणतीही मोठी कारवाई होऊ नये, अशी प्रार्थना भारतीय चाहते करत आहेत.





