अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा रविवार (दि.22) शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेला पाचवीचे 37 हजार 951 तर आठवीचे 20 हजार 640 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील पाचवीच्या पहिल्या पेपरला 658, दुसर्या पेपरला 662 तर आठवीच्या पहिल्या पेपरला 426 आणि दुसर्या पेपरला 430 असे 2 हजार 176 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
गैरहजर असणार्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क जिल्हापरिषद प्रशासनाने भरलेला आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील गैरहजर विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय होणार याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष राहणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यापुढे इयत्ता चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यिता शाळांमधील विद्यार्थी बसू शकतात. या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन पेपर द्यावे लागणार आहेत. प्रत्येक पेपर 150 गुणांचा राहणार आहे. परीक्षेत वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न असून विद्यार्थ्यांना बहुपर्यायातून एक अचूक पर्याय निवडावा लागतो.
दरम्यान, पूर्वीपासून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. पण, काही वर्षांपूर्वी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. आता तो पुन्हा बदलण्यात आला असून यापुढे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा होणार आहे. यामुळे रविवारी झालेली पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षाही शेवटची परीक्षा होती. दुसरीकडे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील सुमारे 50 हजार विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या निकालानंतर मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार आणि साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते. पुढील तीन वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू राहत असते.
दरम्यान, रविवारी झालेल्या परीक्षेला पाचवीच्या पेपर क्रमांक एकला 38 हजार 609 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यातील 37 हजार 951 विद्यार्थी हजर होते तर 658 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. पेपर क्रमांक दोनला 38 हजार 609 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 37 हजार 947 विद्यार्थी हजर होते. तर 662 विद्यार्थी गैरहजर होते. आठवीच्या पेपर क्रमांक 1 ला 21 हजार 66 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 20 हजार 640 विद्यार्थी हजार होते. परीक्षेला 426 विद्यार्थ्यांनी तर पेपर क्रमांक दोनला 21 हजार 66 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 20 हजार 636 विद्यार्थी हजर होते. 430 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.




