शनिशिंगणापूर (वार्ताहर)
शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निश्चित करणार असल्याची चर्चा शिंगणापुरात सुरु असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले ‘भावी विश्वस्त’ मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा रंगली आहे. विश्वस्त मंडळाची नियुक्ती मुख्यमंत्री महोदय करणार असल्याची खात्रीलायक माहिती भाजपच्या गोटातून समजली आहे.
याबाबत माहिती अशी की, राज्याच्या न्याय व विधी विभागाने शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ सन २०२५ मध्ये बरखास्त केले होते. त्याची मुदत संपल्यानंतर एक एप्रिलला नवीन विश्वस्त मंडळाची नवीन घटनेनुसार नियुक्ती केली जाईल असे शासनाकडून सांगण्यात आले, त्यामुळे १५ दिवसापासून आपली विश्वस्त पदासाठी वर्णी लागावी यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न होताना दिसत आहेत. या नवीन कार्यकारी मंडळामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार असल्याने सर्वांचे घोषणेकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान आपल्यालाच विश्वस्तपद मिळावे यासाठी राज्यपातळीवर हालचालीला वेग आला आहे. दरम्यान विधी व न्याय विभाग सविस्तर अभ्यास करून कुठल्या व्यक्तीचा, कोणत्या ठिकाणाच्या नागरिकांचा समावेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीची घोषणा लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे.





