मुंबई | Mumbai
सामान्य नागरिकांना वेगळा कायदा आणि राजकारण्यांसाठी कायदा वेगळा झाला आहे, हीच महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. शीतल तेजवानीला पुण्यातील महार वतनाच्या जमीन हडप करण्याच्या प्रकरणात झालेली अटक फक्त दिखावा असून पार्थ पवारचे नाव सुद्धा एफआयआरमध्ये नसल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मोठा फार्स आहे
माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, एक मोठा फार्स हा सध्या महाराष्ट्रात चालू आहे. ज्याची सुरुवात ५ नोव्हेंबरपासून झाली आहे आणि सगळ्या माध्यमांनी सगळी बातमी दाखवून सुद्धा आताच्या घटकेला त्या प्रकरणात काहीही होताना दिसत नाही. सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही. जर सामान्य माणसाच्या मुलाने काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकले जाते. पण अजित पवारांच्या मुलाने १८०० कोटींची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचे नाव एफआरएमध्ये येत नाही. ही आताची महाराष्ट्राची हकीकत आहे, असा आरोप त्यांनी केला.
दिग्विजय पाटलांवर गुन्हे दाखल असताना बहारिनला कसे पाठवण्यात आले?
दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली आहे त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. देश सोडून गेल्यावर परत किती लोक येतात? अनेक लोक चौकशीसाठी येईन अशी ग्वाही देतात. पण येत नाहीत. दिग्विजय पाटील यांना परदेशी जाण्याची संमती दिलीच कशी काय? जर दिग्विजय पाटील आलेच नाहीत तर जबाबदारी कुणाची आहे? त्यांना रोखणे गरजेचे होते असे मला वाटते. कारण आत्ताचा जो चार्ज आहे त्यात ७ ते १४ वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. ज्या अधिकाऱ्यांनी दिग्विजय पाटील यांना परदेशी जाण्याची संमती दिली आहे. शीतल तेजवानी यांना रॉयल ट्रिटमेंट मिळाली, त्यांना पोलिसांनी कसे सोडले हे सगळे माध्यमांनी दाखवले त्यानंतर शीतल तेजवानी यांना सामान्य लोकांप्रमाणे वागवले गेले हे पाहून मला बरे वाटले असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
हे दाखवण्यासाठी शीतल तेजवानीला अटक केली
अंजली दमानिया म्हणाल्या की, तुम्ही राजकारणी असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. पण मुंढवा जमीन प्रकरणात समन्स केले, सगळे केले, एका छोट्याशा एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव देखील नाही. त्या एफआयआरमध्ये फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावे आहेत. महत्त्वाचे म्हणजे शीतल तेजवानीला यासाठी अटक करण्यात आली, कारण 8 डिसेंबर रोजी अधिवेशन सुरू होत आहे. त्या ठिकाणी विरोधकांकडून आकांडतांडव केला जाईल, म्हणून आम्ही एफआयआर केली, आम्ही समिती नेमली, आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली, तसेच शीतल तेजवानीला अटक केली, हे दाखवायला हवे, यासाठी कारवाई करण्यात आली आहे. खरे सांगायचे तर या प्रकरणात काहीही होताना दिसत नाही. स्पष्टपणे दिसत आहे की, फक्त चौकशा होत आहे, असे मत मांडत अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




