श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
महावितरण वीज कंपनीने गणेशोत्सवाचे नावाखाली श्रीरामपूर शहरात भारनियमन सुरु केले असून रात्री 2 च्या सुमारास काही परिसरात वीज पुरवठा खंडित केला जातो. तो पुन्हा सकाळी 9 वाजता सुरु करण्यात येतो. सकाळी पिण्याच्या पाण्याच्या वेळेत वीजपुरवठा नसल्यामुळे नागरिक संतापले आहेत. शहरातील वॉर्ड नं 7, वढणे वस्ती परिसरात गेल्या 8 दिवसांपासून रोज रात्री 2 च्या सुमारास वीज पुरवठा महावितरण कंपनी खंडित करीत आहे.
रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे उष्णता व डासांचा त्रास होत आहे. कारण पंखेही बंद राहतात. तसेच अंधारामुळे चोरीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा खंडित करावा रात्री पूर्ववत वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. महावितरणचे शहराचे उपअभियंता मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या भागात वीज पुरवठ्याचा अधिक लोड आहे त्या परिसरात गणेशोत्सात्वामुळे रात्री भारनियमन केले जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला असून भारनियमन कमी करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.