श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचार्यांमधील वादाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. आता तर वीज विभागातील अभियंत्याने थेट कंत्राटी कर्मचार्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी संदीप वायकर या कर्मचार्याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मनोज मोरे या अभियंत्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच सर्व विभागांना लेखी तक्रारही पाठविण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, संदीप हौशीराम वायकर हे गेल्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने डाटा ऑपरेटर म्हणून पालिकेत कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती वीज विभागात करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपूर्वी मनोज संजय मोरे हे वीज विभागात अभियंता म्हणून बदलून आले. त्यानंतर वायकर आणि मोरे यांच्यात अनेकदा कामावरून आणि इतर कारणांवरून वाद होत होते.
मोरे हे मद्यपान करून कामावर येत असल्याचा आरोपही तक्रारीमध्ये केला आहे. मद्यधुंद अवस्थेत मोरे कार्यालयात वायकर यांच्यावर चिडचिड करणे, शिवीगाळ करणे, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे वाजवणे तसेच गुलामासारखी वागणूक देत होते. शिवाय, कुठलेही कारण नसताना 18 जून रोजी वायकर यांना कामावरून काढून टाकत आपल्या पत्नीला ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी पदावर नियुक्त करून घेतले.
वायकर यांनी याबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी मोरे यांना समज दिली. मात्र, त्यांच्या वागणुकीत कुठलाही बदल झाला नाही. उलट 19 जून रोजी वायकर कामावर आले असता, मोरे यांनी त्यांना खुर्चीतून उठण्यास व बाहेर जाण्यास सांगितले. वायकर यांनी नकार दिल्यानंतर मोरे यांनी वायकर यांना गचांडी धरून बाहेर ढकलले. त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच स्थानिक गुंडांमार्फत जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार प्रारंभात उपमुख्याधिकारी यांच्याकडे व नंतर मुख्याधिकारी यांना सांगण्यात आला. आता वायकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी मोरे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
नागरिकांच्या समस्यांपेक्षा वाद अधिक
पालिकेमध्ये गेल्या वर्षभरापासून कर्मचार्यांमध्ये किरकोळ वाद ते हाणामारीपर्यंत प्रकरणे झाली आहेत. कधी कधी हे वाद आपसात मिटतात, तर अनेकदा चव्हाट्यावर येतात. त्यातच आर्थिक अनियमितता आणि अपहारासंबंधी होणार्या तक्रारींची दखल घेऊन सध्या काही अधिकारी व कर्मचार्यांच्या चौकशा सुरू आहेत. त्यांचे अहवालही अद्याप गुलदस्त्यात आहेत. हे सर्व सुरू असताना नागरिकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा कार्यालयातील समस्यांनीच अधिकारी बेजार झाले असल्याचे चित्र सध्या नगर पालिकेत दिसत आहे.
दोघांची बाजू समजावून घ्यावी लागेल
गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्यात वाद चालू आहेत. वायकर यांनी याबाबत माझ्याकडे तक्रारही केली होती. काल त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती आहे. दोघांची बाजू समजावून घ्यावी लागेल.
– मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी




