मुंबई | प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने सूडबुद्धीने कारवाई करत खासदारकी रद्द करुन त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोदी सरकारच्या या दडपशाहीविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, बुधवारी १२ जुलैला मुंबईत मंत्रालय जवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर मौन सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे. मौन सत्याग्रह आंदोलन सकाळी १० वाजता सुरु होईल.
या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी सहभागी होणार आहेत.