सोनई |वार्ताहर| Sonai
गाडी हळू चालव, असे दोघांना सांगितल्याचा राग आल्याने त्यांच्यासह एकूण दहा जणांनी मंदिरावर दगडफेक केली तसेच तलवार फिरवून दहशत निर्माण केल्याची घटना सोनई येथे घडली. याबाबत सोनईतील 8 व राहुरी तालुक्यातील दोघांसह अन्य 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिमन्यू विलास कुसळकर (वय 21) धंदा-मजुरी, रा. बालाजीनगर सोनई यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, गाडी हळू चालव असे वैभव वाघ व अक्षय पंडित यांना सांगितले असता आरोपींनी एकत्र जमून हातात दांडके व तलवार घेऊन आमच्या गल्लीत आले व मोठमोठ्याने शिवीगाळ करून बालाजी मंदिर व परिसरातील घरांवर दगड फेकून, हातात तलवारी फिरवून दहशत निर्माण केली. गल्लीतील जाणार्या महिला सारिका धनवटे व कोमल गुंजाळ यांना जाणीवपूर्वक शिवीगाळ करून सोनईत फक्त आरजे कंपनीची दहशत चालणार अशी धमकी दिली.
या फिर्यादीवरून वैभव वाघ, अक्षय पंडित, आकाश काकडे अभिषेक त्रिभुवन, अक्षय साळवे, सचिन काकडे, ऋषी गायकवाड, मख्यी उर्फ गणेश वैरागर (सर्व रा. सोनई) तसेच निखील जाधव व विनोद वाघमारे (दोघे रा. ब्राह्मणी ता. राहुरी) या दहा जणांसह अन्य 15 ते 20 जणांवर गुन्हा रजिस्टर नं. 420/2024 भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 352, 351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बी. जी बाचकर हे करत आहेत.
दरम्यान सोनई येथे दगडफेक करून शस्त्रे घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या निषेधार्थ आरोपीवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी सकाळी गाव बंद ठेवून सोनई पोलिस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. सोनई पेठेतील हलवाई गल्लीतील परिसरात शस्त्रे हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले व नागरिकांमध्ये असुरक्षितता व दहशत निर्माण झाली आहे. यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सोनई पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी निवेदन स्वीकारून आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. सोनई पोलिसांना निवेदन दिल्यानंतर सोनई येथील व्यवहार सुरळीतपणे चालू झाले.