खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकर्यांवरील संकटाची मालिका संपता संपत नसून सुरुवातीला पावसाने शेतकर्यांना वेठीस धरले. हवामान खात्याच्या 20 जूननंतरच्या दमदार पावसाचा अंदाजावर विश्वास ठेवून पेरणीच्या कामाने गती घेतली, मात्र, मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाला. आता उगवलेल्या सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत चांगली वाढ झाली आहे.
सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या समस्यांमुळे हैराण झाले आहेत. अंकुरलेल्या सोयाबीनच्या रोपांची पाने अचानक पिवळी पडू लागली. तसेच अनेक रोपं कोमेजू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारली. त्यात 3344 सारख्या सोयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. काही ठिकाणी बियाणं बोगस निघाल्याने सोयाबीन उगवलेच नाही. आता जे बियाणे उगवले आहे, ते अचानक पिवळे पडू लागले आहे. रोपं सुकत आहेत.
सोयाबीनवर नेमका रोग तरी कोणता पडलाय, असा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे, आणि पिकाच्या नुकसानाची भीती आणखी वाढली आहे. सोयाबीनचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे व उपाययोजना शेतकर्यांना समजत नसल्याने शेतकरी संभ्रमित झाले आहेत. अधिक पावसामुळे जमिनीमध्ये अधिक ओलावा राहिल्याने मुळांना श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येतो. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. तर अपुर्या पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन पीक वाढीसाठी आवश्यक असणारे पाणी व अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडते, असा अंदाज बांधला जात आहे.
तर काही शेतकर्यांच्या मते खोड किडल्याने त्याचा प्रादुर्भाव आणखी वाढतो, आणि पाने पिवळी पडतात. समस्या कुठली निर्माण झाली हे समजत नसले तरी त्याचा प्रादुर्भाव 100 टक्के असल्याचे चित्र आहे. खैरी निमगाव येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी सांगितले की, आमच्या शेताजवळ विविध प्रकारच्या सोयाबीनच्या व्हरायटी असून सर्वच पिके पिवळी पडत आहेत. यावर कृषी विभागाने मार्ग काढल्यास शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, अन्यथा यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाऊ शकतो.





