मुंबई | Mumbai
आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेमध्ये बुधवारी (१८ फेब्रुवारी) रोजी अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर आज भारत आणि नेदरलँड्स (India and Netherlands) यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे. नेदरलँड्स संघाचे कर्णधारपद स्काॅट एडवर्डस तर भारताचे नेतृत्व सुर्यकुमार यादवकडे आहे
भारतीय संघाने अमेरिका विरूध्द २९ नामिबिया विरूध्द ९३ धावांनी आणि पाकिस्तान विरुद्ध ६१ धावांनी दणदणीत विजय संपादन करून विश्वचषक स्पर्धेमध्ये दणक्यात सुरुवात केली आहे. आता नेदरलँड्स विरूध्द विजय संपादन करून सुपर ८ मध्ये आत्मविश्वासाने उतरण्यासाठी सूर्यकुमार यादवची टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे.
गोलंदाजीमध्ये भारताकडे (India) जलद आणि फिरकीचा समतोल पर्याय असल्याने प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे नेदरलँड्स संघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध ३ गडी राखून नेदरलँड्स संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर नामिबिया विरूध्द ७ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला होता. मात्र अमेरिका विरूध्द ९३ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने नेदरलँड्स संघाचे सुपर ८ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे विश्वचषक मोहिमेची विजयी सांगता करण्यासाठी नेदरलँड्स सज्ज आहे.
दरम्यान, मोठ्या संघांविरुद्ध आश्चर्यकारक खेळी करण्याची नेदरलँड्सची परंपरा लक्षात घेता भारताला हा सामना हलक्यात घेणे परवडणारे नाही. तर आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे दोन्ही संघांमध्ये २०२२ विश्वचषक स्पर्धेमध्ये एकमेव टी २० सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी नेदरलँड्स सज्ज आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या लढतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





