मुंबई । Mumbai
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी AIIMS रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालामध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला. त्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. आमची चौकशी ही प्रोफेशनल होती.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह बोलतांना म्हणाले, “मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. या षडयंत्रामागे कोण आहेत याचा तपास केला जात आहे. आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
तसेच “मुंबई पोलिसांनी आपला चौकशी अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला होता. त्याबद्दल केवळ सहा जणांना माहिती होती. त्यात तपास अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त, राज्याचे महाधिवक्ता व न्यायाधीश यांचा समावेश होता. इतर कुणीही हा अहवाल पाहिला नव्हता किंवा कोणाला अहवालात काय आहे याची अजिबात माहिती नव्हती. असं असतानाही काही लोकांनी विनाकारण मुंबई पोलिसांच्या तपासावर टीका केली,” असं परमबीर सिंह म्हणाले.