शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
कार्यक्षेत्रातील उसाची प्रथम पूर्ण तोडणी झाल्याशिवाय कार्यक्षेत्राबाहेरील ऊस साखर कारखान्यांनी गाळपासाठी आणू नये, अशी मागणी जनशक्ती मंचचे अॅड.शिवाजीराव काकडे व जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
याबाबत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे, रज्जाक शेख, उदय बुधवंत, विष्णू दिवटे, डॉ. ज्ञानेश्वर डमाळ, वैभव पुरनाळे, कॉ.रामजी पोटफोडे, राजू पोटफोडे, पांडुरंग गरड, योगेश देशमुख, लक्ष्मण वाणी, ज्ञानेश्वर फसले, शेषेराव गिर्हे, बाळासाहेब पाटेकर, अंबादास दिवटे, भाऊसाहेब बोडखे, किसनराव झुंबड, राजेंद्र दोडके, मनोहर कातकडे, भगवानराव डावरे, सुभाष आंधळे, कल्याणराव कमानदार, मुकुंद घनवट, रामनाथ आढाव, बाबासाहेब कार्ले, तुकाराम कापरे, भारत नजन, छाया आढाव, मीरा गाढे यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी ऊस तोडणीसाठी शेतकर्यांना जे पैसे द्यावे लागले ते पैसे परत मिळावेत, सन 2022-23 च्या ऊस गळीत हंगामामध्ये शेतकर्यांकडून ऊस तोडणीसाठी पैसे घेण्यास कारखान्याकडून प्रतिबंध घालावा व तसे झाल्यास ते पैसे कारखान्याने संबंधित ऊस उत्पादक शेतकर्यास परत द्यावेत. अनेक कारखाना व्यवस्थापन कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस कमी भावात आणून त्याचे गळीत करतात. तथापी यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा 14 ते 16 महिन्यांच्या उसाचे गळीत वेळेत न झाल्यामुळे उसाचे एकरी उत्पन्न घटले आहे. जोपर्यंत संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप होत नाही, तोपर्यंत कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गळितासाठी आणण्यास साखर कारखान्यांना बंदी घालण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी श्री.शेखर गायकवाड म्हणाले, ज्या शेतकर्यांना मागील हंगामात ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागले त्या शेतकर्यांनी त्याचा अर्ज कारखान्याकडे देऊन त्याची एक प्रत साखर संचालक यांच्याकडे पाठवावी. यासह शेतकर्यांनी एकत्र येऊन प्रथम कार्यक्षेत्रातील ऊस तोडीचा आपापल्या ग्रामपंचायतचा ठराव घेऊन संबंधित कारखान्यांना द्यावा आणि त्याची अंमलबजावणी करून घ्यावी.