मुंबई । Mumbai
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात बरेच मोठे बदल झाले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले. अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार हे दिल्लीत खासदार झाले. दुसरीकडे पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांना आव्हान दिले जात असल्याचा दावा करण्यात आला.
खबरदारी म्हणून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून पक्षाची सर्व सूत्रे आपल्याच हाती कसे असतील, यासाठी सर्व सोपस्कार पार पडले. परंतू आता थेट सुनेत्रा पक्षातूनच पवार यांना आता उघड आव्हान मिळाले आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता धोक्यात येते की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. पक्षातीलच नेत्याने त्यांना नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं आहे?
पक्षातील ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीवरच थेट आक्षेप घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वकिलांमार्फत थेट नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, पक्षाचे सचिव ब्रजमोहन श्रीवास्तव यांना पाठवण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, अजितदादा यांचे निधन होऊन अद्याप वर्ष लोटलेले नाही. तरीदेखील राष्ट्रवादी पक्षात पवार कुटुंबाला अंतर्गत आव्हान मिळत आहे. सच्चिदानंद सिंह यांनी यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध आहे, असा खळबळजनक दावा केला आहे. २६ फेब्रुवारीची निवड अवैध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सच्चिदानंद सिंह यांनी हा दावा नेमका कोणत्या आधारावर केला? हे अद्याप समोर आलेले नाही. त्यावेळी सुनेत्रा पवार यांची निवड केली गेली तेव्हा काही कायदेशीर त्रुटी राहिल्या होत्या का? असं विचारलं जात आहे.
नेमका कट कोण रचतंय ?
तसेच आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षात सर्वकाही आलबेल चालू होतं. सुनेत्रा पवार या पूर्ण ताकदीने पक्षाच्या वाढीसाठी सक्रीय झालेल्या आहेत. असे असताना अचानक त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्न उपस्थित केल्याने यामागे नेमके कोण आहे? कोणाला काय सिद्ध करायचे आहे ? राष्ट्रवादी पक्षातीलच काही बडे नेते यामागे आहेत का? असेही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही, त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचा कुठलेही कारण नाही, सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून झालेली आहे, अशी प्रफुल पटेल यांनी एबीपी माझाला माहिती दिली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सुधारणा पक्षांमध्ये आवश्यक आहे, हे नोटीस येण्याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये माझं मत मी मांडलं. या माझ्या मताचा आणि नोटीसचा कुठलाही संबंध नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी पक्षांतर्गत काही सुधारणा करण्याच्या गरजेचे आहे, असं प्रफुल पटेल यांनी सांगितले.




