Thursday, July 23, 2026
HomeराजकीयSunil Tatkare : सुनील तटकरेंनी शशीकांत शिंदेंना फटकारलं, विलीनीकरणावर स्पष्टच बोलले

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी शशीकांत शिंदेंना फटकारलं, विलीनीकरणावर स्पष्टच बोलले

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आणि शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर आपली आक्रमक भूमिका मांडली असून, चुकीचे लिखाण थांबवले नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा शशिकांत शिंदे यांना दिला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी एका लेखाद्वारे अजित पवार यांच्या राजकीय निर्णयांवर भाष्य केले होते. या लेखात त्यांनी ‘अदृश्य हात’ आणि ‘धमक्यांमुळे’ अजित पवारांना बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला, असा दावा केला होता. तटकरे यांनी या शब्दांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “अजितदादांनी आपली कोणतीही इच्छा लपवून ठेवली नव्हती, त्यांनी सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. त्यामुळे शिंदेंचे हे लिखाण अनाठायी आणि पूर्णपणे चुकीचे आहे,” अशा शब्दांत तटकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना तटकरे म्हणाले की, एखादी आघाडी करताना मुख्य पक्षाला विश्वासात घेणे आवश्यक असते. सध्या एनडीएमध्ये भाजप हा मुख्य पक्ष आहे आणि त्यांच्याशी चर्चा करूनच राष्ट्रवादी एनडीएचा घटक बनली आहे. शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या संदर्भात जे लिखाण केले आहे, त्यामागचा नेमका हेतू काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “जर अशा प्रकारचे चुकीचे लिखाण वारंवार होत राहिले, तर राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

आमदार हिरामण खोसकर यांच्या नाराजीच्या चर्चांवरही सुनील तटकरे यांनी भाष्य केले. खोसकर यांना अजित पवारांनीच उमेदवारी दिली होती आणि ते निवडून आले, याची आठवण तटकरेंनी करून दिली. “खोसकर यांना रात्री किती वाजता उमेदवारी दिली गेली, हे मला चांगलेच माहित आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोलेन आणि त्यांचे मत जाणून घेईन,” असे तटकरे म्हणाले. खोसकर यांनी आमदार म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा खंबीर घटक पक्ष आहे आणि भविष्यातही तो एनडीएसोबतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूणच, शशिकांत शिंदे यांच्या लेखातील दाव्यांमुळे महायुती आणि शरद पवार गटात नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तटकरे यांनी ‘जर-तर’च्या राजकारणावर बोलण्यास नकार दिला असला तरी, पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या विधानांना सहन केले जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...