मुंबई | Mumbai
खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी केली. यासोबतच मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केल्याचे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. आता यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी नैतिक जबाबदारी आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सर्वांच्या भावनांचा आदर मी केलाच पाहिजे. एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे, समजून घेणे आणि नुसते समजून घेणे नाही तर त्यातून मार्ग काढणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तिथे फार काही झालेले नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय? असे त्यांनी म्हटले.
आम्हाला छोटे पक्ष म्हणून हिणवले जात होते
पाऊस प्रचंड आहे, काही ठिकाणी लाईट नाहीये, आंदोलकांची गैरसोय होत आहे. सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले की, मलाही गंमत वाटते की, एकीकडे आम्हाला संपलं, संपलं असे म्हणतात. छोटा पक्ष म्हणतात आणि इतकं मोठं आंदोलन उभे राहते तेव्हा त्याचा केंद्रबिंदू शरद पवारच होतात. त्यांचे 250 आमदार आहेत. तीनशे खासदार आहेत असा पक्ष शरद पवारांकडे वळतो ही कमालच आहे, असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
या सगळ्यांचा केंद्रबिंदू ज्यांचे आमदार खासदार जास्त आहेत हे सगळे महायुतीकडेच आहे. अपेक्षा सगळे शरद पवार यांच्याकडे आहे ही गंमत आहे. आंदोलनाला जबाबदार आत्ताच सरकार आहे, आंदोलन हाताच्या बाहेर नाही, सरकारला विनम्र विनंती करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांशी चर्चा करा जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा. अधिवेशन बोलावा, २४ तासात हे सगळे मान्य करून टाका मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, सलग अकरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचे सरकार आहे. २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरक्षणाची सविस्तर मागणी केली होती आणि आरक्षण कसे देता येईल? याबाबतही आपल्या भाषणात सांगितले होते. आज ते सत्तेत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जो उपाय तुम्ही २०१८ साली विधानसभेत सांगितला होता त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा. गृहखात्याला माहिती आहे तर आम्हाला पण कळू द्या. गृहखाते नाही तर सरकार फेल ठरले आहे, जबाबदारी सगळी घ्यायची असते. कायदा सुव्यवस्था सरकार करत आहे का आणि काल जरांगे पाटील यांनी याबाबत आंदोलकांना सांगितले आहे. सरकारकडून अजून कोणीही गेले नाही ,पोलिस कोणी गेले नाही, अतिशय अस्वच्छता आहे, सरकार ऐकत नसेल पण काही अधिकारी काम करत आहेत. मुंबईकरांना वेठीस धरले जाते तर चर्चेला बसा. भुजबळ साहेब यांना का उतरावे लागते आहे, न्यायासाठी उतरवा लागत आहे, हे सरकारचे अपयश आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




