नवीन नाशिक । प्रतिनिधी Nashik
कारखान्यात कर्तव्य बजावत असतांना करोना विषाणुचा संसर्ग होवून मृत्यु झाला .
अशा कामगारांच्या वारसांना अथवा त्या परिवारातील किंवा त्या परिवाराने सुचविलेल्या व्यक्तीस सेवेत सामावुन घेण्याबाबतची मागणी आ. सीमा हिरे व भाजप कामगार आघाडी शहराध्यक्ष हेमंत नेहते यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, कामगार उपायुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक पश्चिम मतदार संघात सातपुर-अंबड या दोन औद्योगिक वसाहती येत असुन या दोन्ही औद्योगिक वसाहती मिळून सुमारे 5 हजारापेक्षा जास्त कारखाने आहेत. या कारखान्यात लाखापेक्षा जास्त कामगार काम करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे. करोना विषाणुच्या संसर्गामुळे बर्याच कामगारांचा मृत्यु झाला आहे.
शासकीय सेवेत काम करणार्या सेवकांचा सेवा बजावत असतांना मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना सेवेते सामावुन घेण्याचा नियम आहे. परंतु कंपनी कामगारांना कर्तव्य बजावत असतांना मृत्यु झाला असेल तर त्याच्या वारसांना सेवेत सामावुन घेतले जात नाही.
करोना विषाणु या आजाराला यापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले असुन मतदार संघातील अनेक निष्पाप कामगारांचा कंपनीत काम करत असतांना करोनामुळे मृत्यु झाला असुन त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ ओढावलेली आह. कामगारांच्या वारसांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.