Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजTMC MP Jawhar Sircar : ममतांना मोठा धक्का! ‘तृणमूल’वर गंभीर आरोप करत...

TMC MP Jawhar Sircar : ममतांना मोठा धक्का! ‘तृणमूल’वर गंभीर आरोप करत खासदाराचा राजीनामा

कोलकाता | Kolkata

- Advertisement -

कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, नागरिकांमध्ये या घटनेवरून सरकारविरोधात नाराजी वाढत असतानाच आता पक्षाती धुसफूसही समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार यांनी अत्याचाराच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असेही पत्रात म्हटले आहे. घटनेच्या विरोधात पक्षातून हा पहिला राजीनामा आल्याने ममतांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आरजी कार हॉस्पिटलमधील घडलेल्या घटनेमुळे मला खुप वेदना होत आहेत. त्या क्रूर घरनेबाबत मुख्यमंत्री तातडीने काही कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. त्या आपल्या जुन्या शैलीत कारवाई करतील असे वाटले होते, पण त्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. कारवाई करण्यासही उशीर केला.

हे ही वाचा : लग्नासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला विवस्त्र केले

जवाहर सरकार पुढे म्हणतात, या प्रकरणात राज्य सरकार जी काही पावले उचलत आहे, ती पुरेशी नाहीत. त्या घटनेनंतर सरकारने भ्रष्ट डॉक्टरांवर आणि दोषींवर ताबडतोब कारवाई केली असती, तर राज्यातील परिस्थिती फार पूर्वीच सामान्य झाली असती. राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा करतो. या पत्रात सरकार यांनी पक्षातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, पंचायत आणि नगरपालिकांमधील स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेत्यांनी प्रचंड संपत्ती जमा केली आहे, त्यामुळे बंगालच्या जनतेचे नुकसान झाले आहे.

आंदोलनाचा मुख्य प्रवाह अराजकीय आहे, असे माझे मत आहे आणि त्याला राजकीय म्हणत संघर्ष निर्माण करणे योग्य नाही. राज्यातील आंदोलक तरुण-तरणींना राजकारण नको, न्याय हवा आहे. हे आंदोलन जितके महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी आहे तितकेच राज्य सरकारचे आहे. त्यासाठी सरकारने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा जातीयवादी शक्ती या राज्याचा ताबा घेतील. मला बंगालचे प्रश्न खासदार म्हणून मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो, पण आता मला खासदार म्हणून अजिबात राहायचे नाही, असे ते आपल्या पत्रात म्हणाले.

हे ही वाचा : लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून तरुणाला मारहाण

दरम्यान, जवाहर सरकार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनेही ममतांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, टीएमसी सरकारमधील भ्रष्टाचार आणि बलात्कार-हत्येचे प्रकरण चांगल्याप्रकारे न हाताळल्याने जवाहर सरकार यांनी राजीनामा दिला आहे. आता ममतांनीही पद सोडण्याची वेळ आली आहे. त्यांनी पोलिस आयुक्तांसोबत एकत्रित येत पुरावे नष्ट केल्याचा आरोपही मालवीय यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या