मुंबई | Mumbai
मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चावर सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात येत आहे. आता या मोर्चावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. मिटकरींनी या मोर्चाला हौशा- गौश्या- नवशांची यात्रा म्हटली आहे.
मतदान यंत्रातील कथित घोळ आणि मतदारयाद्यांवर आक्षेप नोंदवत गेली काही महिने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीने तीव्र लढा छेडला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सत्याचा मोर्चाचे नियोजन सुरू होते. शनिवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आजच्या मोर्चाला महत्त्व प्राप्त झाले होते. या मोर्चात ठाकरे बंधू आणि शरद पवार यांनी भाषणे केली. दरम्यान, हा मोर्चा झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून या मोर्चावर टीका करण्यात येत आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी यांनी सत्याचा मोर्चावर टीका करताना म्हंटले, हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा असल्याचा चिमटा आमदार अमोल मिटकरींनी काढला आहे. महायुती भक्कमपणे काम करत असल्यानेच महाविकास आघाडी आणि मनसे असे मोर्चे काढत असल्यास मिटकरी म्हणाले. अजितदादा बारामतीमध्ये असताना आपल्या परिवाराशी बोलतात तसे त्या सभेत बोलल्याचे मिटकरी म्हणाले. यावरून काही अक्कल नसलेले लोक ‘ट्वीट’ करीत आपल्या बुद्धीचे प्रदर्शन करीत असल्याचे ते म्हणाले. यावरून टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
अजित पवारांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणारे महामूर्ख आहेत. त्यांनी मुंबईतील रुग्णालयात जात आपल्या मेंदूची तपासणी करावी, असा सल्ला मिटकरींनी दिला. दरम्यान, दादांचं बारामती होमग्राउंड आहे, तिथल्या शेतकऱ्यांसोबत घरोबाच नातं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्मविश्वासाने ते बोलले. मात्र, त्यांचं व्यक्तव्य कसं चुकीचं आहे. हे दाखवण्यासाठी काहींचा प्रयत्न असतो. तेच त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेली चमकोगिरी पाहायला मिळाली, असेही मिटकरी बोलले.
हा मोर्चा हौशा-गौश्या-नवश्यांची हास्य जत्रा
मतचोरीविरोधात मनसे आणि महाविकास आघाडीचा एल्गार पाहायला मिळाला. पण याच सत्याच्या मोर्चावर देखील आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली. दरम्यान, मविआचा आज निघालेला मोर्चा हा महाराष्ट्राला मनोरंजन देणारा आणि हौशा- गौश्या- नवशांची हास्य जत्रा असल्याची टिका केली आहे. भविष्यातला पराभव पाहता हा मोर्चा होता, या हास्य मोर्चाचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र महाराष्ट्राला मनोरंजन देणारा आजचा हा मोर्चा निघाला असल्याचं मिटकरी म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




