Sunday, May 5, 2024
Homeनाशिकनाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंची बदली; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंची बदली; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांची बदली झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने काढले आहेत.

- Advertisement -

संदीप कर्णिक हे यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

अंकुश शिंदेंची दहा महिन्यातच झाली बदली

अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिकचे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी दि. 13 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आली. त्यांच्या आधी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची नऊ महिन्यातच बदली करण्यात आली होती.

वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात ते अपयशी ठरत असल्याने त्यांची बदली करून त्या ठिकाणी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंकुश शिंदे यांनी या आधी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी पार पाडली होती. ते नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालतील अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र, नाशिकमधील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज प्रकरणी निर्बंध घालण्यात पोलिसांना अपयश आले. आता अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे.  

कोण आहेत नाशिकचे नवे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक?

पुण्याचे याआधीचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांची पुण्यातील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. संदीप कर्णिक हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मावळमधील शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांनी स्वतः बंदुकीने शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. 9 ऑगस्ट 2011 साली झालेल्या या गोळीबारात एका महिलेसह तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 14 शेतकरी जखमी झाले होते.
  
पिंपरी-चिंचवड शहराला पुणे जिल्ह्यातील पवना धरणातून बंद पाईपलाईन मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठी मावळ भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागणार होत्या. 9 ऑगस्ट 2011 रोजी या अधिग्रहणाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा जमाव अचानक पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आला आणि त्यांनी एक्स्प्रेस वे रोखून धरला.

त्यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश संदीप कर्णिक यांनी दिले. त्याचबरोबर स्वतःकडच्या बंदुकीतून त्यांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता.  

संदीप कर्णिक हे राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांचे जावई होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यावेळी शिवसेना-भाजपने केला होता. या घटनेनंतर संदीप कर्णिक यांची ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरुन बदली करण्यात आली होती.

दरम्यान, चार वर्षांपूर्वी खातेनिहाय चौकशीत संदीप कर्णिक निर्दोष ठरले होते. शिवाय केवळ समज देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने कर्णिक यांना क्लीन चिट मिळाली होती. आता कर्णिक यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या