मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षातील तरुण तडफदार नेत्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे. यावेळी कार्यकर्त्यांचा मुंबईतील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीकास्त्र सोडत खोचक टोला लगावला आहे.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) म्हणाले की, “तुम्ही सगळे योग्य वेळेला एकत्र आलात. पराभव ज्याच्या जिव्हारी लागतो तेच इतिहास घडवू शकतात. उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. तुम्ही कुठल्या पक्षातून आला त्याबद्दल मला बोलायचं नाही मात्र पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला हेतू आणि दिशा लागते ती काहीच नाही. तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही”, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
तसेच मी शिवसेना (Shivsena) एकच मानतो. शिवसेना ही दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला पण नाही. फक्त निशाणी बदलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतो जे सर्व्हे होत होते त्यात लोक आपल्या बाजूने होते. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पण त्यांची दांडी कशी उडाली हे सगळ्यांना माहिती आहे. हे चोरांचे आणि दरोडेखोरांचे राज्य आहे. हे राज्य आपल्याला उलथून टाकायचे आहे. ठिणगी तर पडली आहे मागील रविवारी बाबा आढाव यांच्या आंदोलनाला भेट दिली”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “आठ दहा दिवसांपूर्वी निकाल (Result) लागले आणि त्यानंतर ही तुम्ही शिवसेनेत येत आहेत. जल्लोषात तुम्ही इकडे येताय मात्र जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाही याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही . म्हणजे विजयात काहीतरी जुमला आहे. मशीन घोटाळा आहे बरेच घोटाळे आहेत. संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे. एक है तो सेफ है असं म्हणतात. हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? हक्काची मुंबई आपली ओरबाडली जात असून आपण गप्प बसणार आहात का? असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.