नागपूर | Nagpur
विधानसभा निवडणूक झाली, आचारसंहिता संपली आहे. महिलांची मते मिळवण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना निवडणुकीच्याआधी आणण्यात आली आणि पैसे दिले गेले. आता ही योजना तात्काळ सुरू केली पाहिजे, असे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला ठणकावून सांगितले आहे. सरकारने आता आवडती, नावडती बहीण असे न करता सर्वांना पैसे दिले पाहिजेत असे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन फडणवीस सरकारला सवाल विचारले. आधी कोणतेही निकष लावले नव्हते, मग लाडकी बहीणचे पैसे देताना आता निकष का लावताय? आवडती नावडती न करता सर्वांना दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, “यापूर्वी अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार होतं. निवडणुकीचा निकाल सर्वांनाच अनपेक्षित आहे, त्यामुळे त्यांना ईव्हीएम सरकार म्हटले जाते. ईव्हीएम सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. जनता नाईलाजाने त्यांच्याकडून अनेक अपेक्षा करत आहेत. काही गावांमध्ये निकालाविरोधात आंदोलने केली जात आहेत. विजयाचा आनंद कुठे दिसला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. मंत्रीपद ज्यांना मिळाले त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार जास्त मोठ्याने वाजत आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
लाडकी बहीणीवरुन उध्दव ठाकरेंचा निशाणा
उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही. महायुतीने सरकार स्थापन केले आहे. सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती. आता लाडक्या आमदारांची चर्चा सुरू झाली आहे. पण, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेवर स्थगिती आणली.” या सरकारची योजना होती लाडकी बहीण, आता लाडके आमदार आणि नाराज आमदार यांची चर्चा सुरू झाली आहे. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली, आता ही योजना तत्काळ सुरू करण्यात यावी. लाडकी बहीण योजनेवर काही निकष लावणार, अशा बातम्या येत होत्या. आता हे निकष बाजूला ठेवून तत्काळ लाडक्या बहिणींना पैसे देण्यात यावे. आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपयांनी थकीत पैसे द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.