नाशिक | प्रतिनिधी Nashik
येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना संपलेली दिसेल, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.महाजन आज (बुधवारी) नाशिक दौ़र्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कृती सामान्य जनतेच्या मनातली भावना होती.त्यामुळे तो एक ब्रँड होता. हा ब्रँड आता राहिलेला नाही. ठाकरे ब्रँडचा केव्हाच बँड झाला आहे. हा ब्रँड संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्व.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हे खरोखरे त्यांच्या विचाराने कर्तुत्वाने एक ब्रॅण्ड झाले होते. मात्र, आता केवळ त्यांच्या आडनावामुळे आातची पिढी ब्रँड होऊ शकत नाही.विचाराशी तडजोड करुन उद्धव ठाकरे यांनीच ठाकरे ब्रँड संपवला. येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोणीही राहणार नाही असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.
तसेच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने नाशिकमध्ये काढलेल्या मोर्चाबाबत बोलतांना महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता कोणीही राहिलेले नाही,याची जाणीव सगळ्यांना झाली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत देखील एक दोन जागांचा फरक वगळता भाजप आघाडीवर
होते. काही लोकांचा आम्हाला पाठिंबा होता. आम्ही आमचा महापौर करू शकलो असतो. आता जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून,भाजपला जनतेची पसंती आहे. विरोधक निवडणुकीत दोन अंकी आकडाही पार करु शकणार नाही”, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप बरोबर निवडणुकीला सामोरी गेली. त्यानंतर मात्र त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली होती. त्याचा फटका त्यांना बसला. उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडले. आता ते कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी तर कधी हिरवा झेंडा हाती घेतात. त्यामुळेच निवडणुकीत जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. येत्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होईल असेही गिरीश महाजन म्हणाले.
तसेच निवडणुका आल्या की मोर्चे काढतात. मात्र सत्ता असताना काय केले याचे उत्तर देत नाही. उद्धव ठाकरे तर अडीच वर्ष घरात बसुन होते. कुंभमेळा कामाबद्दल ते प्रश्न विचारतात.मात्र कुंभमेळा भव्य दिव्यच होईल. त्याची चिंता तुम्ही करु नका. आम्ही काय करुन दाखवतो ते पहात राहा असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.





