श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील उंदीरगाव येथील शेतकरी राजेंद्र उर्फ बापूसाहेब अण्णासाहेब ताके (वय 45) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना उंदीरगाव-माळेवाडी रस्त्यावरील एका हॉटेलच्या किचनमध्ये घडली. राजेंद्र ताके यांनी शनिवारी दुपारी सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मृताच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आल्याची माहिती समोर येत असून, त्यामध्ये काही व्यक्तींचा उल्लेख असल्याचे बोलले जात आहे. तथापि, या चिठ्ठीतील मजकूर किंवा त्यातील उल्लेखांबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात खासगी सावकारीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनी या भागात बेकायदेशीर सावकारीचे जाळे वाढत असल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या व्यवहारांमुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 33/2026 अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येची कारणमीमांसा, चिठ्ठीतील मजकूर आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू असून, तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.




