Saturday, July 27, 2024
Homeनगरजानेवारीपासून 1 हजार 357 शेतकर्‍यांना अवकाळीचा दणका

जानेवारीपासून 1 हजार 357 शेतकर्‍यांना अवकाळीचा दणका

1 हजार हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान || कांदा, चारा पिकांसह फळबागा उद्ध्वस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चालूवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासून प्रत्येक महिन्यांत टप्प्या टप्प्याने अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. या पावसामुळे कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात शेती पिकांसोबत फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत जानेवारी महिन्यांपासून मे 2024 पर्यंत जिल्ह्यात सात वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यात 1 हजार 357 शेतकर्‍यांचे सुमारे एक हजार हेक्टरच्या जवळपास 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. यासह 33 टक्क्यांच्या आत नुकसान असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वेगळी असून यामुळे आधीच पाणी टंचाईशी समाना करणार्‍या शेतकर्‍यांना अवकाळीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

- Advertisement -

यात खर्चिक पिक असणार्‍या फळबागांचा देखील समावेश आहे. मागील वर्षी पावसाळ्यात खंडपडल्यामुळे आणि त्यानंतर परतीच्या पावसाने हात आखडता घेतल्याने जिल्ह्यात खरीपासह रब्बीच्या पिकांना चांगलाच फटका बसला होता. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मध्य हंगाम पिका विम्याच्या भरपाई रक्कमेच्या 25 टक्के अग्रामी देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. जिल्ह्यात मागील वर्षी पिका विम्याच्या 25 टक्के अग्रीमसाठी 2 लाख 65 हजार 653 शेतकरी पात्र होते. या शेतकर्‍यांना 171 कोट 19 लाखांचा अग्रीम मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात परतीचा पाऊस गायब झाला.

गेल्या चार वर्षाच्या पावसाच्या सरासरीत सप्टेंबर महिन्यांत सर्वात कमी पावसची नोंद 2023 मध्ये झाली. हे प्रमाण राहुरी, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक होते. यामुळे शेतीच्या पाण्याची स्थिती बिकट असतांना जानेवारीपासून 19 मे पर्यंत जवळपास प्रत्येक महिन्यांला अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान केले. या पावसामुळे शेतकर्‍यांना कोटवधी रुपयांचा फटका बसला आहे.

अवकाळीचा फटका
जिल्ह्यात चालूवर्षी जानेवारी महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसात नगर तालुक्यातील 28 शेतकर्‍यांचे 13.50 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर फेबु्रवारी महिना कसाबसा कोरडा गेला. पुन्हा मार्च महिन्यांत दोन वेळा झालेल्या अवकाळीत पाथर्डी आणि जामखेड तालुक्यातील 4. 50 हेक्टर, त्यानंतर 87.17 हेक्टवरील 182 शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका बसला. एप्रिल महिन्यांत जोरदार अवकाळीचा तडाखा बसल्याने नगर, पाथर्डी, कर्जत तालुक्यातील 898 शेतकर्‍यांना 482 हेक्टवरील पिकांना दणका बसला. मे महिन्यांत आतापर्यंत 13 तारखेला 499 शेतकर्‍यांची 251 हेक्टर, 14 तारखेला 73 शेतकर्‍यांची 41.84 हेक्टर, 15 तारखेला 4 शेतकर्‍यांची 0.60 हेक्टर आणि 19 तारखेला 15 शतेकर्‍यांची 5.70 हेक्टरवरील फळबागा उध्दवस्त झाल्या आहेत. झालेल्या नुकसानेचे हे प्रमाण 33 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने हे शेतकरी शासनाच्या मदतीस पात्र असल्याचे सांगण्यात आले. कृषी विभागाने महिनानिहाय झालेले नुकसान आणि त्यापोटी आवश्यक असणारी भरपाईची रक्कम महसूल विभागामार्फत शासनास कळवलेली आहे.

या पिकांना अवकाळीचा दणका
जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू असणार्‍या अवकाळीमुळे कांदा, उन्हाळी बाजरी, मिरची, मका, चारा पिकासोबत आंबा, डाळिंब, केळी, लिंबू, पपई, संत्री, टोमॅटो, चिक्कू, चेरी या फळबागांना मोठा फटका बसला आहे. यात विशेष करून आंबा, डांळीब, संंत्रा या फळबागांसाठी शेतकर्‍यांना मोठा खर्च करावा लागत आहे. यंदा संत्रा बाग असणार्‍या शेतकर्‍यांना विपरीत हवामानाचा फटका असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या