संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा देत सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी, अशी आग्रही मागणी केली.
निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, संपत डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र शेतकरी हा कायम संकटात आहे. मोठ्या अडचणीवर मात करून तो पीक पिकवतो. मात्र अस्मानी संकटामुळे अनेकदा पिके वाया जातात. आलेल्या पिकांना भाव मिळत नाही.
अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर जोरदार वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे गोठे पडले आहेत. या भागात डाळिंब, कांदा, मका याचबरोबर उभे असलेली सर्व पिके वाया गेली असून या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकरी व बाधित नागरिकांना त्वरित भरीव मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली.




