मुंबई | Mumbai
महाराष्ट्राकडे येणारा ‘वेदांता’ ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला. ६०:४० जॉईन्ट व्हेंचर असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा हा प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा होता. हा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास दीड लाख नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या.
हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रकल्प गुजरातला गेल्याने संताप व्यक्त केला आहे. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच हे लक्षणं महाराष्ट्रासाठी चांगले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?’ असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.
तसेच ‘हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं’, असेही ते म्हणाले.