नाशिक । प्रतिनिधी Nashik
आदिवासी बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानावर बुधवारी (दि.7) बिर्हाड मोर्चा काढण्याचा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, निफाड, सिन्नर, कळवण, सुरगाणा या तालुक्यांत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतात. त्यापैकी आदिम जमात असलेल्या कातकरी कुटुंबांची संख्यादेखील या तालुक्यात मोठी आहे. मात्र अद्याप त्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आदिवासी तालुक्यातील कातकरी भूमिहीन शेतमजूर, विधवा, अपंग यांना प्राधान्याने शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, एकही कातकरी कुटुंब व इतर आदिवासी कुटुंब या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी 1 मार्च रोजी आदिवासी विकास आयुक्तालयावर बिर्हाड मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी आयुक्तांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने 7 जून रोजी बिर्हाड मोर्चा काढण्याचा निर्णय एल्गार कष्टकरी संघटनेने घेतला आहे. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानावर हा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा संघटनेचे भगवान मधे यांनी दिला.