बेलापूर |वार्ताहर| Belapur
गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून, समुद्राला वाया जाणारे 55 टीएमसी पाणी गोदावरी खोर्यात आणण्यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्चाची योजना नियोजित आहे. त्याद्वारे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार, तसेच प्रत्येक बेघराला घर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवास योजनेचा उद्देश आहे. योजना शासनाची आहे, त्यासाठी शासनाने जमीन दिली आहे, पालकमंत्री म्हणून ही योजना पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असल्याने योजना सुरु ठेवा, अडथळे आणणार्यांचा बंदोबस्त मी करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व चौक सुभोभीकरण शुभारंभ, घरकुल जागा वाटप, विद्यार्थ्यांना 150 सायकलींचे वाटप यासह 6 कोटी 12 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले होते. कार्यक्रमास भाजपा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी सभापती नानासाहेब पवार, भाजपा उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, नानासाहेब शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, नाना शिंदे, पोपटराव जाधव, रामराव शेटे, केतन खोरे, विराज भोसले, अशोक भोसले, किशोर बनकर, डॉ.मुठे, महेश खरात, भिमा बागुल, अॅड.कैलास आगे, संजय छल्लारे, राधाकृष्ण आहेर, विठ्ठल राऊत, महेंद्र पटारे, रवी पाटील, दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, गणेश मुदगुले, अॅड.सर्जेराव घोडे, अॅड.प्रविण लिप्टे, संदीप भोसले, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी विवेक गुंड, विस्तार अधिकारी विजय चराटे, माजी उपासभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख, स्वाती अमोलिक, तबसुम बागवान, प्रियांका कुर्हे, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे आदी उपस्थित होते.
ना. विखे पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाने जगाला अचंबित केले आहे. सबका साथ, सबका विकास हे विविध योजनांद्वारेे प्रत्यक्षात येत आहे. देशातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी नियोजन केले जात आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.ग्रामविकास व शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून ही तूट भरुन काढण्यासाठी पश्चिमेकडचे समुद्राला वाहून जाणारे 55टी.एम.सी. पाणी गोदावरी खोर्यात आणले जाणार आहे. याचप्रमाणे प्रवरा व गोदावरी कालव्यांचे नुतनीकरण, लाभक्षेत्रातील सर्व चरांचे नुतनीकरण यासह वळदगाव को.प. बंधार्याचे 70 कोटी खर्चाची तरतूद करुन व्हर्टीकल बरेजमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. यासह ग्रामदैवत हरिहर केशव गोविंद घाट, सय्यदबाबा दर्गा घाट सुशोभिकरण कामासाठी निधीची तरतूद केली जाईल. बेलापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे श्री.विखे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शरद नवले यांनी बेलापूर हे रेसिडेन्शिअल हब तसेच तिर्थस्थळ म्हणून विकसित करण्याचा मनोदय आहे. 15 कोटी खर्चाचा नदीसंवर्धन विकासाचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे. बेलापूर-केशव गोविंद बन व उक्कलगाव या त्रिस्थळीसाठी बोटिंग, नावघाट ते केशव गोविंद घाट विकास यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अद्ययावत व्यायामशाळा, स्पर्धा परीक्षा केंद्र, महिला बचत गट भवन, क्रिडा संकुल अशी कामे करायची आहेत. त्यासाठी ना.विखे पा. यांनी निधी उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे, नतद्रष्ट विरोधक चांगल्या कामाला आडवे येत आहेत. घरकुल वसाहतीला राधाकृष्णनगर व सुजयनगर नामकरणाला विरोध केला. यांचे संगमनेरचे नेतेही दहा वर्षे मंत्री होते. त्यांनी बेलापूरसाठी काहीही केले नाही. फक्त आश्वासने देवून झुलवत ठेवले, अशी टिका श्री. नवले यांनी केली.
प्रास्ताविकात अभिषेक खंडागळे म्हणाले की, ना.विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली 126 कोटीची पाणीपुरवठा योजना, साठवण तलाव व घरकुलासाठी 43 एकर मोफत जमीन, 1000 घरकुलांना मंजुरी, खंडकर्यांच्या वर्ग 2 च्या जमिनी विनामोबदला वर्ग 1 करणे आ कामे केली. ही विकासकामे विरोधकांना देखवत नाहीत. घरकुलाबाबात तक्रारी, उपोषण, मोर्चे असे कुभांड करुन घरकुल योजना बंद पाडण्याचे कारस्थान केले जात आहे. ज्यांनी घरकुल वसाहतीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरच पंधरा दिवसांपूर्वी ना.विखेंसमोर नतमस्तक होण्याची नियतीने वेळ आणली. हे त्यांचे ना. विखेंबाबतचे पुतना मावशीचे प्रेम आहे.
विरोधकांच्या तक्रारीमुळे 6 मीटरऐवजी 9 मीटर व 12 मीटरचे रस्ते केल्यास 552 घरकुले होतील. व 500 लाभार्थ्यांना वंचित राहावे लागेल. त्यांची जबाबदारी विरोधकांनी घ्यावी, असे खंडागळे म्हणाले. याप्रसंगी सरपंच मिनाताई साळवी, रणजीत श्रीगोड, प्रफुल्ल डावरे, ईस्माईल शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. ग्रा. पं. सदस्य मुश्ताक शेख यांनी आभार मानले. सूत्रसंचलन संतोष मते यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, गावकरी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फक्त मानसिकता हवी
दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर कायदा सुव्यवस्थेची स्थिती अवघड होत चालली आहे. जग गतीमान झाले आहे. जगा बरोबर आपण ही गतीमान झालो आहोत. आज प्रत्येकाला वेळेची किंंमत समजली आहे. पैशापेक्षा वेळेला जादा महत्व आहे. श्रीरामपूर जिल्हा झाला तर जनतेचा वेळही वाचेल आणि पैसा ही वाचेल. फक्त संबधीतांची हा जिल्हा करण्यासाठी मानसिकता झाली पाहिजे, असे सत्यजित कदम यांनी सांगितले.





