पंचवटी | प्रतिनिधी Panchvati
तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात स्वराज्य शक्ती सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी दिला आहे. तपोवन परिसरात १८०० वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव असून दुसऱ्या ठिकाणी १८ हजार झाडांसाठी खड्डेही करण्यात आले आहेत. “ज्यांनी हे खड्डे केलेत, त्यांनी स्वतःच त्या खड्ड्यात पुरून घ्यावं; पण तपोवनातील झाडांना हात लावू नका,” असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तपोवनातील साधुग्राम परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या गुरुवारी नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी परिसरात वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, “तपोवन’ या नावातच ‘तप’ आणि ‘वन’ आहे. साधूसंतांनी शेकडो वर्ष तपश्चर्या केलेल्या भूमीवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय हा हिंदू धर्माच्या नावाखाली कार्यरत असलेल्या सरकारचा दुटप्पीपणा आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावात ‘देव’ असताना, त्यांनीच या पवित्र वनाची कत्तल करण्याची तयारी दाखवली आहे. उद्योजक अदानी-अंबानी यांच्या घशात ही जमीन घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
, “२०० वर्षांहून जुनी झाडे सरकार पुन्हा कुठून आणणार? दहा वर्षांच्या आतील झाडे तोडणार म्हणजे घरातील दहा वर्षांच्या मुलांना कापण्यासारखेच आहे! वृक्ष हे घरातीलच सदस्य आहेत. त्यामुळे एकही झाड तोडू देणार नाही. आंदोलन तीव्र करावे लागले तर मी स्वतः उपोषणाला बसेन.”नाशिककरांसाठी ही झाडं प्राणवायूचे मोठे स्त्रोत असल्याचे सांगत त्यांनी ओझोन थराच्या संरक्षणातही या वनक्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचा उल्लेख केला. “महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. हीच भूमी उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन पेटून उठेल,” असा त्यांनी इशारा दिला.
यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका करताना “हिंदू-मुस्लिम मुद्दे निर्माण करून राजकारण करणे काहींचे काम आहे. पण आम्ही फक्त निसर्गाचे रक्षण करणारे. पंचतत्वांनी शरीर निर्माण झाले, त्या पंचतत्वांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे तीव्र शब्दांत सांगितले.




