मुंबई | Mumbai
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.१२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आज सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोण गुलाल उधळणार अन् कोण बाजी मारणार याचा निर्णय आज होणार आहे. निकालापूर्वीच काही ठिकाणी बिनविरोध निवड देखील झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेतील ७३१ जिल्हा परिषद सदस्यांपैकी १०० जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- ७०, शिवसेना शिंदे गट- ३८, राष्ट्रवादी अजित पवार गट- ४३, काँग्रेस- २१, शिवसेना ठाकरे गट- १४, राष्ट्रवादी शरद पवार गट- ३, इतर- ११ जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
अजित पवार गटाची मुसंडी
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या ठिकाणी भोसरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवून राज्याला पहिला निकाल दिला आहे. हा विजय अजित पवार गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण माढा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा राणसंग्राम राहिला आहे. अश्विनी दळवी यांच्या विजयामुळे या भागातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सोलापूरमध्ये अशी आहे लढत
महूद गटाचे शिवसेनेचे उमेदवार दादासो लवटे व गणाचे गणाचे शिवसेनेचे बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर व महूद गणाचे शिवसेनेचे सोनाली पाटील विजयी झाले आहेत. तर करमाळा जिल्हा परिषद पांडे गटातून भाजपच्या नेत्या रश्मी बागल पिछाडीवर आहेत. तर शरद पवार गटाचे उमेदवार राणी संतोष वारे आघाडीवर आहेत. करकंब गटातून भाजपाचे आदिनाथ देशमुख ७०० मतांनी आघाडीवर आहेत.





