अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar
जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी गठीत राज्यस्तरीय समितीने अभ्यास करून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष करून मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी 16 उपाययोजनासह 25 उपक्रम राबवण्याचे सुचवले आहे. यात जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घेतील, त्यांना प्रोत्साहन म्हणून स्थानिक करात सवलत देण्यासारखे कर माफी अभियान राबविण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. याशिवाय, शिक्षणाची वारी, ग्रंथदिंडी आणि चावडी वाचन यासारख्या उपक्रमांतून संपूर्ण गाव शैक्षणिकदृष्ट्या साक्षर करण्याचा मानस आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पट संख्या वाढवण्यासाठी आणि या शाळांना सुवर्ण दिवस मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग मार्च ते जून 2026 या कालावधीत व्यापक उपक्रम राबवणार आहे. यात खाजगी शाळांच्या स्पर्धेत सरकारी शाळांचा टक्का वाढवण्यासाठी राज्यस्तर समितीने नुकताच आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर केला असून त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष नगरचे सुपूत्र तथा शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण पुणे रमाकांत काटकारे हे भूषावत आहे. या समितीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी असे एकूण 13 सदस्य असून यात कोपरगावच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांचाही समावेश आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडवा, पट वाढवा हे विशेष अभियान राबवून गावपातळीवर प्रवेशाचा संकल्प केला जाणार आहे. या अभियानासाठी विशेष गीत तयार करण्यात आले असून त्याद्वारे जिल्हा परिषद शाळांमधील स्मार्ट टीव्ही, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि पोषण आहार अशा सुविधांची माहिती घराघरात पोहोचवली जाणार आहे. केवळ जाहिरातबाजी न करता, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वतः दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शाळा आपल्या दारी उपक्रमांतर्गत पालकांशी संवाद साधणार आहेत. मुलांच्या प्रगतीत मातांचा सहभाग वाढवण्यासाठी माता-पालक मेळावे आयोजित केले जातील, ज्यात मुलांचा आहार, आरोग्य आणि अभ्यासाच्या सवयींवर चर्चा केली जाईल. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे असलेला ओढा लक्षात घेऊन, शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सेमी-इंग्रजी वर्ग सुरू करण्यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच, शाळेच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे यशोगान करणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून शाळांची विश्वासार्हता वाढवली जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि प्रगत शिक्षण मिळावे, हे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या आपल्या जिल्हा परिषद शाळांना आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यासाठी आम्ही सेमी-इंग्रजी आणि स्मार्ट क्लाससारखे बदल घडवून आणत आहोत. गुढीपाडवा, पट वाढवा या अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून आपण मराठी शाळांचे वैभव पुन्हा प्राप्त करूया. पालक, शिक्षक आणि स्थानिक प्रतिनिधींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्थानिक प्रशासनालाही जोडण्यात आले आहे. जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घेतील, त्यांना प्रोत्साहन म्हणून स्थानिक करात सवलत देण्यासारखे करमाफी अभियान राबविण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. याशिवाय, शिक्षणाची वारी, ग्रंथदिंडी आणि चावडी वाचन यांसारख्या उपक्रमांतून संपूर्ण गाव शैक्षणिकदृष्ट्या साक्षर करण्याचा मानस आहे. राज्यस्तरीय समितीने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानूसार राज्य सरकार काय काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
काटमोरे यांचा शिक्षक ते शिक्षण सहसंचालक प्रवास
राज्यस्तरीय पटसंख्या वाढ समितीचे अध्यक्ष हे नगरचे रमाकांत काटमोरे आहे. काटमोरे हे नगर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम सुरू केल्यावर टप्प्याने आधी शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहचले आणि त्या ठिकाणी कामाची चूणूक दाखवल्याने तसेच पदोन्नतीने ते सध्या पुणे या ठिकाणी शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालये पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. काटमोरे यांच्या या पूर्वी शिक्षण विभागात राज्य पातळीवरील विविध महत्वाच्या जबाबदार्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यांचा शिक्षक ते सहसंचालक हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
अधिकारी घेणार केंद्र शाळा दत्तक
प्रशासकीय स्तरावरही या मोहिमेची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागातील वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी प्रत्येक केंद्र दत्तक घेतील आणि तेथील भौतिक सुविधा व गुणवत्तेवर वैयक्तिक लक्ष देतील. प्रत्येक बीट स्तरावर एक आदर्श शाळा मॉडेल म्हणून विकसित केली जाणार आहे.




