मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
राज्यातील १२ जिल्हा परिषदा (Zilla Parishad) आणि १२५ पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकांमध्ये भाजप राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून या निकालांमधून भाजप-महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. १२ जिल्हा परिषदेत भाजप आणि महायुतीचीच सत्ता येणार असून १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजप (BJP) सत्ता स्थापन करेल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (BJP State President Ravindra Chavan) यांनी सोमवारी दिली. या निवडणुकीत महायुतीचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिनिधी निवडून आले असून उबाठा, काँग्रेसला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले असल्याचेही चव्हाण म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) भाजपची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करत प्रचार करतात. मात्र यावेळी अजितदादांच्या निधनानंतर संवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारात भाग न घेण्याचे तसेच कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यानी प्रचारात भाग घेतला नसला तरीही महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी ताकदीने केलेल्या विकासकामांमुळे भाजप महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते टाकल्याबद्दल चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले.
विरोधकांकडून सातत्याने नकारात्मक राजकारण केले जात असताना, भाजपने मात्र लोकहित केंद्रस्थानी ठेवून विकासाचे राजकारण केले असल्याने मतदारांनी महायुतीला साथ दिली. आगामी काळात ग्रामीण महाराष्ट्र अधिक सक्षम करण्यासाठी भाजप कटिबद्ध राहील, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली आहे.





