मुंबई | Mumbai
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.१२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आज सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोण गुलाल उधळणार अन् कोण बाजी मारणार याचा निर्णय आज होणार आहे. निकालापूर्वीच काही ठिकाणी बिनविरोध निवड देखील झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 100 जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- 38, शिवसेना शिंदे गट- 22, राष्ट्रवादी अजित पवार गट- 19, काँग्रेस- 11, शिवसेना ठाकरे गट- 6, राष्ट्रवादी शरद पवार गट- 0, इतर- 5 जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
रायगड, कोकणात महायुतीने बाजी मारली
रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे (शिंदे) दोन उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून अनिल जाधव यांच्या विरोधात उमेदवारांनी माघारी घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या (शिंदे) डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कोकणात महायुतीच्या तब्बल २७ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ८, तर पंचायत समितीच्या १७ जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्गात ५० सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तर पंचायत समितीमध्ये १०० सदस्यसंख्या असून भाजपचे १६ आणि शिंदे शिवसेनेचा १ सदस्य बिनविरोध विजयी झाल्याचे समोर आले आहे.
सोलापूर माढ्यात भाजपचे उमेदवार विजयी
भोसरे गटात व गणात संजयमामा शिंदे यांचे तिनही उमेदवार विजयी.
धाराशिवमध्ये कोणाच्या बाजूने निकाल
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. आधी टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मुख्य ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या ३० मिनिटांमध्ये निकाल फिरला आहे. धाराशिव तालुक्यातील ढोकी पंचायत समितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विजयी झाले आहे. अमर नाना समुद्रे हे विजयी झाली आहे. अमर नाना समुद्रे ४१८ मत मिळवून विरोधकांचा पराभव केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पंचायत समिती निवडणुकीत विजयी खाते उघडले आहे.
तर दुसरीकडे कळंब तालुक्यातील ईटकुर गटातून शिवसेनेचे उमेदवार आनंद पिंटू लंगडे विजयी झाले आहे. तर पंचायत समितीच्या दोन्ही जागा महायुतीच्या विजय झाला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





