अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यामधील संवर्ग दोनमधील पात्र 374 गुरूजींच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापूर्वी मागील आठवड्यात जिल्ह्यातील संवर्ग एकमधील 863 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर संवर्ग दोनमधील 374 आशा एकूण आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 237 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्यांची प्रक्रिया करण्यात आलेली असली तर बदली झालेल्या संबंधीत शिक्षकांना अद्याप बदलीच्या ठिकाणी सोडण्याच्या आदेशाबाबत संभ्रम अवस्था असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शिक्षकांच्या बदल्याबाबत खंडपिठात याचिका दाखल असून त्यावर सुनावणी देखील सुरू आहे. या याचिकेच्या निकालाला आधी राहूनच शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाणार असल्याचा अंदाज शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी 1 ते 4 संवर्गात वर्गीकरण करून बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात येते. यातील संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता संवर्ग तीनमधील पात्र शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेसाठी आज (सोमवार) पासून प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. या संवर्गात अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम केलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनूसार बदल्या होणार आहेत. त्यानंतर संवर्ग चारमध्ये एकल शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनूसार बदली होणार आहे.
संवर्ग दोनमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक पती- पत्नी यांचे एकत्रिकरण करण्यात येते. यासाठी या दोघांच्या शाळांमधील अंतर हे 30 किलो मीटरपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषद शिक्षक तसेच राज्य सरकार अथवा केंद्र सरकारच्या शासकीय विभागात काम करणार्या शिक्षक अथवा शिक्षिका यांचे संवर्ग दोनच्या बदल्यामध्ये एकत्रिकरण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यामध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन हे दोनच संवर्ग किचकट असून उर्वरित संवर्ग तीन व चार हे सोपे संवर्ग आहे. यातील संवर्ग तीनमध्ये तर जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांना बदल्यामध्ये सहभाग घेता येतो.
दरम्यान, संवर्ग एकमधील शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असल्या तरी या संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांमधील घटस्फोटीत, परिक्त्या, दुर्गधर आजाराने पिडीत विद्यार्थ्याचे पालक गंभीर आजारानेग्रस्त शिक्षक यांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे भूंगा कायम असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यांच्या पातळीवरून या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची नव्याने तपासणी करण्याचे आदेश काढले असून यासाठी जिल्हा शल्यचिकित्स यांनी स्वतंत्र मेडिकल बोर्डाची निर्मिती करून संबंधीत शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासून जिल्हा परिषदेला अहवाल देण्याच्या सुचना केलेल्या आहेत. यामुळे आता जिल्हा रुग्णालयाच्या अपंग प्रमाणपत्र आणि दुर्गंध आजाराच्या प्रमाणपत्रांच्या तपासणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




