येवला | प्रतिनिधी
एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू यांच्याविरुद्ध येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे नाव वैशाली नामदेव नवले (वय २५) असे आहे. याबाबत तिचे वडील शरद रामचंद्र निकुळे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, वैशालीचा विवाह जून २०२३ मध्ये नामदेव मारुती नवले याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही महिन्यांनंतर शेतीच्या कामासाठी आणि चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात येऊ लागली. मागणी पूर्ण न झाल्याने पती नामदेव, सासरे रुस्तुम मारुती नवले आणि सासू विमलबाई मारुती नवले यांनी वैशालीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सततचा त्रास, शिवीगाळ आणि पैशांसाठीचा दबाव यामुळे वैशाली मानसिकदृष्ट्या खचली होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या छळाला कंटाळून वैशालीने घरासमोरील शेततळ्यात उडी घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी पती, सासरे व सासू यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.




