मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर या निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार २ हजार ८६९ जागांसाठी तब्बल १५ हजार ९३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबईतील २२७ जागांसाठी १ हजार ७०० उमेदवार झुंज देत आहेत. येथून ४५३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी महापालिकानिहाय निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची माहिती दिली. त्यानुसार ठाण्यात २६३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १३१ जागांसाठी ६५६ उमेदवार रिंगणात आहेत. नवी मुंबईत ५५२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने येथे १११ जागांसाठी ८५९ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
वसई – विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी ५४७, कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांवर ४८९, उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४३२, पुण्यात १६५ जागांसाठी १ हजार ११६, पिंपरी – चिंचवड महापालिकेत १२८ जागांसाठी ६९२, भिवंडी – निजामपूरमध्ये ९० जागांकरता ४३९, मिरा – भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अन्य महापालिकांमध्ये उमेदवार संख्या
जळगाव : ७५ जागांसाठी ३३३ उमेदवार, धुळे: ७४ जागांसाठी ३२० उमेदवार, अहिल्यानगर : ६८ जागांसाठी २८३ उमेदवार
.




