जळगाव | Jalgaon
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत (Jalgaon Vidhan Parishad Election) महायुतीसमोर (Mahayuti) उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर टळले आहे. शिवसेना (शिंदे गट) च्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नाशिकपाठोपाठ जळगावचाही पेच सुटला आहे. त्यानंतर आता जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन, ठाकरे सेनेचे शरद तायडे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीच्या (Mahayuti) प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी, रेश्मा काळे यांच्या माघारीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी माझे सविस्तर बोलणे झाले आहे. आता यामध्ये कोणतीही अडचण उरलेली नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे मुंबईत असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांच्याशीही फोनवरून सविस्तर चर्चा झाली आहे, असे सांगितले होते.
दुसरीकडे बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती आणि त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पक्षादेशाचे पालन करत त्यांनी निवडणुकीतून (Election) माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, यावेळी रेश्मा काळे (Reshma Kale) म्हणाल्या की, “पक्षाचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत (Meeting) सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या आदेशाचे पालन करून मी महायुतीला पाठिंबा देत आहे. तसेच आजपासून माझा प्रचार थांबवत आहे”, असे म्हटले.




