Tuesday, June 16, 2026
HomeनाशिकNashik News : पतीच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या दोन तासांत पत्नीनेही सोडले...

Nashik News : पतीच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या दोन तासांत पत्नीनेही सोडले प्राण; एकाच वेळी निघाली दाम्पत्याची अंत्ययात्रा

मनमाड | Manmad

पती-पत्नीचे नाते हे जन्मोजन्मीचे मानले जाते, सुख-दुःखात ते दोघेही नेहमी एकमेकांना साथ देताना दिसतात. मात्र, जिल्ह्यातील मनमाडमध्ये (Manmad) आपल्या पतीसोबत सावलीसारखी उभे असणाऱ्या पत्नीने पतीच्या (Husbend) निधनाची बातमी ऐकताच अवघ्या दोन तासांत आपलेही प्राण सोडल्याची एक अत्यंत करुण आणि मन हेलावून टाकणारी घटना गुरुवारी (दि. ११) रोजी घडली. या घटनेमुळे एकाच वेळी घरातून पती-पत्नी या दोघांचीही अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण मनमाड परिसरावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शहरातील (Manmad City) शांतीनगर भागात राहणारे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी अर्जुन देवरे यांना हृदयविकाराचा (Heart Attack) त्रास असल्याने त्यांच्यावर नाशिक (Nashik) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नी सुनंदा देवरे या कुटुंबासह नाशिकला रुग्णालयात राहून पतीची अहोरात्र सेवा करत होत्या. पतीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचे मन खात होते. याच दरम्यान, गुरुवारी आवश्यक वस्तू घेण्यासाठी सुनंदा देवरे काही काळासाठी मनमाड येथील घरी आल्या होत्या. त्यानंतर आवश्यक साहित्य घेऊन त्या पुन्हा नाशिकला जाणार होत्या.

दरम्यान, गुरुवारी नाशिकहून निघण्यापूर्वीच अर्जुन देवरे यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. निधनाची बातमी समजताच नातेवाईक मृतदेह (Dead Body) घेऊन मनमाडकडे रवाना झाले. सायंकाळी पाच वाजता अंत्ययात्रा निघणार असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले होते. घरात पतीच्या निधनामुळे प्रचंड शोककळा पसरली असतानाच, सुनंदा देवरे (वय ६८) यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने मनमाडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र पतीचा मृतदेह घरी पोहोचण्यापूर्वीच सुनंदा देवरे यांचे निधन झाले.

दोघांची एकाचवेळी काढावी लागली अंत्ययात्रा

पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन तासांतच पत्नीचाही मृत्यू झाल्याने निसर्गाचा हा क्रूर खेळ पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. अखेर एकाच दिवशी, एकाच वेळी या दाम्पत्याची अंत्ययात्रा काढावी लागली. या घटनेमुळे नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपूर्वी तरुण मुलाचाही झाला होता मृत्यू

देवरे दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. मात्र, नियतीने या कुटुंबावर (Family) आधीच मोठा आघात केला होता. अवघ्या दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या विवाहित तरुण मुलाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, अशी माहिती मयत देवरे यांचा पुतण्या केतन यांनी दिली. तरुण मुलाच्या निधनाचे दुःख पचवत नाही तोच आता आई-वडिलांचेही छत्र हरपल्याने देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...