नवी दिल्ली | वृत्तसंस्था
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला भेट देत सीजेपीचे नेते अभिजित दीपके यांची भेट घेतली. आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी, “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कोणत्याही दबावाला घाबरू नका, शेवटपर्यंत लढा,” असा संदेश दिला.
दिल्लीतील आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते. त्यांनी अभिजित दीपके यांच्यासह इतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या, आंदोलनाची पार्श्वभूमी आणि त्यांच्यावरील कथित पोलीस कारवाईची माहिती घेतली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “काल तुम्ही दाखवलेली हिंमत कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील युवक देशाच्या तरुणांचे नेतृत्व करत आहे. तुम्ही निडरपणे लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.” तसेच “सरकार बदलल्याशिवाय परिस्थितीत बदल होणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.
तरुणांच्या आंदोलनाचे कौतुक करताना ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या भविष्यावर लाठीचार्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे. हा देश हुकूमशाहीच्या मार्गाने चालणार नाही. मी येथे पाठिंबा देण्यासाठी आणि तरुण शक्तीला सलाम करण्यासाठी आलो आहे,” असे ते म्हणाले.
जंतरमंतर येथे देशभरातील विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांतील कथित अनियमितता (NEET, CBSE, CUET आदी) तसेच लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून पाठिंबा दर्शवला होता. आता त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट दिल्याने या आंदोलनाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.




