मुंबई | प्रतिनिधी Mumbai
नीट पेपरफुटीच्या विरोधात देशभरात सुरु असलेले आंदोलन आता गावोगावी पोहचवण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्यानुसार उद्या, शनिवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कँडल मार्च आणि सत्याग्रह आयोजित करण्यात आल्याची माहिती पक्षाने दिली आहे.
परीक्षेचे पेपर वारंवार फुटत असून गेल्या दहा वर्षांत तब्बल १५२ वेळा पेपर लिक होऊनही मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. या निगरगट्ट सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ नाही. आपले हक्क मागणाऱ्या तरुण मुला-मुलींवर जागोजागी अमानुषपणे मारहाण केली जात आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभर कँडल मार्च आणि सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
देवाभाऊंची कृती दुर्योधनाची : सपकाळ
दरम्यान, आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी पद्धतीने वागत आहेत. मुलांना ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्यानंतर आता दादरमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली. विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनासारखी असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
दरम्यान, पेपरफुटीविरोधात उद्धव आणि राज ठाकरे यांनी रविवारी आयोजित केलेल्या मोर्चामध्ये काँग्रेसचा सहभाग राहिल, अशी माहितीही सकपाळ यांनी दिली.




