मनमाड | प्रतिनिधी Manmad
एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले. सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्याने आठवडे बाजारातील बाजारकरूंसह व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून उकाड्याने हैराण झालेले नागरिकही सुखावले.
शहर परिसरातील तापमापकातील पारा ४० अंशाच्या गेला होता त्यामुळे जीवघेण्या उकड्याने नागरिक त्रस्त झाले होते. यातून सुटका होण्यासाठी सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. शुक्रवारी शहरात पावसाने हजेरी लावली होती मात्र दमदार पाऊस झाला नव्हता त्यामुळे उष्मा कमी होण्याऐवजी वाढला होता. पंखे, कुलर देखील गरम हवा फेकत होते. आज रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेनंतर पावसाचे आगमन झाले. सुरुवातीला पावसाच्या हलया सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढून त्याने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
रविवारी मनमाडचा आठवडे असतो. आठवडे बाजार हा शहरासोबत ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मानला जातो. नेहमीप्रमाणे शहरातील भगतसिंग मैदान, शिवाजी चौक, कॉलेज रोड, इदगाह परिसर, जैन मंदिर परिसर या भागात आठवडे बाजार भरला होता. त्यात शहरातील नागरिकांसोबत पंचक्रोशीतील शेतकरी विक्रीसाठी भाजीपाला, धान्य यासह इतर वस्तूची दुकानी थाटली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेले ग्राहकांसह दुकानदारांची एकच तारांबळ उडली. पावसामुळे भाजीपाल्यासह इतर वस्तू भिजल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.




