नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सुरगाणा तालुक्यात भेट दिली. या दौऱ्यात ते देवलदरी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतकऱ्यांसह भाताची लावणीही केली.
जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या दौऱ्यात सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, तहसीलदार रामजी राठोड, तालुका कृषी अधिकारी सुरगाणा ज्ञानदेव तिखे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विचारपूस केली. त्यांनी सांगितले की, सुरगाणा तालुक्यातील नागरिक कष्टाळू आहेत. या तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत प्रशासन प्रभावीपणे काम करीत आहे. ते विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. कठीण भौगोलिक परिस्थिती, दुर्गम भाग आणि विविध आव्हानांचा सामना करत अधिकारी व कर्मचारी समर्पित भावनेने कार्यरत आहेत. त्यांचे अथक परिश्रम, समन्वय आणि कर्तव्यनिष्ठेमुळे शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असून प्रशासनाची कार्यक्षमता अधिक बळकट होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही लोकाभिमुख सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या संपूर्ण सुरगाणा तालुका प्रशासनाचे यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कौतुक केले.




