नाशिक | प्रतिनिधी Nashik
भारतीय युवक काँग्रेसच्यावतीने विद्यार्थी आणि युवा पिढीला मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे (पाटील) यांच्या पुढाकारातून गंगापूर रोड येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आयएमआरटी सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाला धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे आणि शहराध्यक्ष बबलू खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते निरंजन टकले, अशोक सोनवणे, प्राचार्य विलास देशमुख आणि प्राचार्य प्रा. सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा, युवकांचे प्रश्न आणि लोकशाहीतील सहभाग यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून युवकांबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविल्याचे सांगितले. देशाच्या जडणघडणीत आणि युवकांच्या विकासात काँग्रेसचे योगदान महत्त्वाचे असून भविष्यातही युवकांच्या उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ. बच्छाव म्हणाल्या की, ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम देशभर राबविला जात असून युवकशक्ती ही देशातील सर्वात मोठी ताकद आहे. युवकांनी ठरविले तर परिवर्तन घडविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ताकद देशाने पाहिली. मात्र, केवळ राजीनामा हा समस्येवरील कायमस्वरूपी उपाय नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर, विशेषतः महिला विद्यार्थिनींवर झालेल्या पोलिस कारवाईवर टीका करत त्यांनी ती दुर्दैवी असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात राहुल गांधी यांनी सातत्याने आंदोलन केले असून युवकांनी काँग्रेसच्या विचारधारेशी जोडून देशाच्या परिवर्तनासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गौरव पानगव्हाणे यांनी सांगितले की, नीट, सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थीच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब मेहनत घेत असते. अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होत असून अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठीच ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रवक्ते निरंजन टकले यांनी राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या प्रत्येक घटनेवर सातत्याने आवाज उठविल्याचे सांगत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा समस्येवरील अंतिम उपाय नसल्याचे म्हटले. युवकांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या भविष्याची जबाबदारी घेणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत लोकशाहीत राज्यकर्ते आणि युवक यांच्यात अर्थपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्राचार्य प्रा. सचिन जाधव, अशोक सोनवणे, प्राचार्य विलास देशमुख आणि ज्येष्ठ विचारवंत निरंजन टकले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कृष्णा सोनवणे, राहुल मोरे, हर्षल देशमुख, अक्षय मुंडे, विशाल काळे, यश बाहुले, अंकित बाहुले, मोनित कोठारी, किरण लोखंडे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.




