
दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान भारत-उझबेकिस्तान संबंधांना नवे बळ मिळाले. आज उझबेकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान असलेल्या ‘ओलिय दराजाली दोस्तलिक’ (Oliy Darajali Do‘stlik) पुरस्काराने सन्मानित केले.
हा सन्मान स्वीकारताना मोदी यांनी हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा, 140 कोटी भारतीयांच्या मेहनतीचा आणि भारत-उझबेकिस्तानमधील शतकानुशतकांच्या मैत्रीचा गौरव असल्याचे सांगितले. त्यांनी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झियोयेव तसेच उझबेकिस्तानच्या जनतेचे आभार मानले.
‘दोस्तलिक’ म्हणजे मैत्री
सन्मानानंतर मोदी यांनी ‘दोस्तलिक’ या शब्दाचा विशेष उल्लेख केला. उझबेकिस्तानकडून मिळालेल्या या सन्मानाचा अर्थच मैत्री असल्याचे त्यांनी नमूद केले. हा पुरस्कार भारताची ओळख, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारतीयांच्या कठोर परिश्रमांचे प्रतिनिधित्व करतो, असे मोदी म्हणाले.
“आपण या सन्मानाचे केवळ माध्यम आहोत. खरा सन्मान हा भारताच्या हजारो वर्षांच्या वारशाचा आणि भारतीयांच्या मेहनतीचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांचा उझबेकिस्तान दौरा कायम स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.




