Friday, May 3, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांसाठी शासनाकडून प्राप्त मदत वाटपात दिरंगाई करणार्‍या बँकांना तंबी

शेतकर्‍यांसाठी शासनाकडून प्राप्त मदत वाटपात दिरंगाई करणार्‍या बँकांना तंबी

नाशिक । प्रतिनिधी

अवकाळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून प्राप्त १८१ कोटी ५० लाखांचा मदत निधी जिल्हा प्रशासनाकडून बँकांकडे वर्ग करण्यात आला. मात्र काही बँका मदत वाटपात दिरंगाई करीत असून याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. ते बघता पुढील काळात कामात सुधारणा न केल्यास आरबीआयकडे तक्रार केली जाईल, अशी तंबी जिल्हा प्रशासनाने बँकांना दिली आहे. दरम्यान, नुकसाग्रस्त शेतकर्‍यांना १७९ कोटी १४ लाख निधीचे वाटप झाले आहे.

- Advertisement -

प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी गुरुवारी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकरी मदत वाटपाबाबत बँक प्रतिनिधींशी चर्चा करून आढावा घेतला. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टवरील पिके आडवी झाली. साधारणत: साडेसात लाख शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका बसला. द्राक्ष, डाळिंब बागांसह मका, सोयाबीन, कांदा, भाजीपाला आदी पिकांची नासडी झाली. शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटींचा आराखडा शासनाकडे पाठवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८१ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 18 हजार आणि खरीप पिकांसाठी ८ हजार रुपये मदत दिली जात आहे. पण बँकांकडून मदत वाटपात दिरंगाई होत असल्याचे बैठकीत समोर आले.

जिल्हा प्रशासनाकडून लाभार्थी शेतकर्‍यांची यादी बँकांना देण्यात आली आहे. मात्र काही यादीत आधारकार्ड, खाते क्रमांक याबाबत एक-दोन चुका असल्या तरी बँकेकडून सर्व यादी जिल्हा प्रशासनाकडे परत पाठवली जात आहे. त्यामुळे त्या यादीतील सर्व शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत. बैठकीत ही बाब निदर्शनास आल्यावर बँक प्रतिनिधींना तंबी देण्यात आली.

मदतीचे धनादेश दिल्यानंतर ते शेतकर्‍यांना देण्यात दिरंगाई का होत आहे, अशी विचारणा बँकांना करण्यात आली. पुढील काळात दुसर्‍या टप्प्यातील मदत निधी प्राप्त होईल. कामकाजात सुधारणा न केल्यास दिरंगाई करणार्‍या बँकांची थेट आरबीआयकडे तक्रार केली जाईल, अशी तंबी बँकांना देण्यात आली.

जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी १७९. कोटी १४ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. ९८.७० टक्के निधी वितरीत केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी जिल्ह्यासाठी प्राप्त दुष्काळ निधी, पूरग्रस्तांसाठी मदत निधी वाटपाचे काम पूर्ण झाले की नाही याचादेखील आढावा घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या