Friday, May 3, 2024
Homeनगरमाजी मंत्री कोल्हे यांच्या सहवासात घडलो

माजी मंत्री कोल्हे यांच्या सहवासात घडलो

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सहकार क्षेत्रात साखर कारखाना चालविताना शेतकरी, मजूर, उसतोडणी कामगार, गोरगरीब आणि दीनदलितांसह सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणारे

- Advertisement -

माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्यासोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली, त्यांच्या सहवासात आम्ही घडत गेलो, समाजातील तळागाळापर्यंतच्या घटकांसाठी काम करण्याची उर्जा त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले कोपरगाव दौर्‍यावर आले असता त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. या वेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध समस्या मांडून विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी केली.

त्यामध्ये मतदार संघातील दलितवस्ती अंतर्गत रस्ते तसेच समाज मंदिर कामासाठी निधी द्यावा, राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची कमी केलेली शिष्यवृत्ती वाढवून द्यावी, विविध महामंडळाच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार्‍या कर्जाची मर्यादा वाढवावी, भारतरत्न डॉ बाबाासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे कामाचा लवकर शुभारंभ करावा, केंद्र सरकारची नविन उद्योग सुरू करण्यासाठी स्टार्टअप योजना ही शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात यावी.

पीएमइजीपी या योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना मिळत असलेल्या कर्जाच्या बाबतीत ज्या काही जाचक अटी सरकारने घालून दिल्या, त्या शिथिल कराव्यात.अशा विविध मागण्या या निवेदनात केल्या. यावेळी ना.आठवले बोलत होते. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांच्या काळात सौ कोल्हे यांनी मतदार संघातील जनतेला खर्‍या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे.

कोल्हे साहेबांचा वारसा त्या चालवत असल्याने समाजातील तळागाळातील घटकांसाठी सौ. कोल्हे यांचे काम सुरू असल्याचेे सांगून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या देशाचा विकास करून समाजाला न्याय देण्याच्या मिशनमध्ये मला दुसर्‍यांदा संधी मिळाल्याने समाजाला न्याय देण्याचे, समाजात परिवर्तन करण्याच्या कामाला गती आली असल्याचेही ना.आठवले म्हणाले.

यावेळी सुमित कोल्हे, आरपीआयचे प्रदेश सचिव विजय वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, कैलास खैरे, सागर जाधव, महावीर दगडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या