जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने तीन दिवसाचा लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
दरम्यान, महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, येणार्या-जाणार्यांची कसुन चौकशी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद असल्याने जिल्हाभरात शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत बाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ होतांना दिसत आहे. दररोज हजारांच्या वर कोरोनाबाधित आढळून येत आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे, मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणे त्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाभरात तीन दिवसांचा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असलातरी काहीजण विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
कोरोना आणि होळी धुलिवंदनाच्या पार्श्वभूमिवर तीन दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
जिल्हाभरात तीन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गासह जिल्हाभरात पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच विनाकारण फिरणार्यांवर उठबशा करण्याची शिक्षादेखील दिली जात आहे.
प्रवाशांची पायपीट
जिल्हाभरात लॉकडाऊन असल्यामुळे रिक्षा बंद आहे. त्यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या प्रवाशांना रिक्षा किंवा अन्य वाहनांअभावी बसस्थानक, रेल्वेस्थानकावरुन पायपीट करत जावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.