नवी दिल्ली | New Delhi
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा (Cylinder) स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत आतापर्यंत २० ते २५ तंबू जळून खाक झाले आहेत. तसेच घटनास्थळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. तर येथील सर्व परिसर खाली करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या आगीत आतापर्यंत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमध्ये सामान जळत असल्याचे समोर आले आहे. तसेच आगीचे (Fire) कारण अद्याप समजू शकलेले नाही.